Friday, August 26, 2016

राजा ‘राजगड’

मराठी मनावर गेल्या अनेक शतकांपासून राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचा सर्व किल्यांच्या राजा ‘राजगड’  ...आणि इ. स १६४७  मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातुन जिंकून जिथे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली तो पहिला किल्ला म्हणजे ‘तोरणा’. आज इतक्या वर्षानंतर त्या किल्यांच्या इतिहास जाणून एका चित्तथरारक सहलीचा आनंद लुटत दोन दिवस शिवकाळात जगण्याचा आनंद काही औरच होता .

पावसाळी पदभ्रमंती आणि ती हि गडांवर म्हंटल्यावर पाऊस आणि चिखल असणार याचा अंदाज होताच. पण राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावातून गड चढवायला सुरवात करावी लागली तीच मुळात चिखलात पाय रोवून. गडाच्या चढणीचे पहिले पाऊल टाकतानाच पुढल्या २८ - ३० तासांचा माझा प्रवास कसा असेल याची एक चित्रफीत माझ्या डोळ्या समोरून क्षण भरात फास्ट फॉरवर्ड मध्ये गेली. अर्थात त्याची मानसिक तयारी हि होतीच.
  दुपारी ३ च्या सुमारास गुंजवणे गावातील रसाळ कुटुंबाने आग्रहाने व प्रेमाने खाऊ घातलेली गरम गरम भाजी भाकरी खाऊन गड चढाई ची सुरुवात केली. निसर्ग किती देखणा आणि बहुरूपी असू शकतो हे चढाई करतांना आपला तोल सावरत आजू बाजूच्या दर्यांन कडे बघितले कि कळत होते. ऊन अजिबात नव्हते मध्ये मध्ये पावसाच्या रिमझिम सरी होत्या त्या हि आल्हाद दायक. झाडं झुडपे, जंगल, चिखल, दगड, सगळ्यांच्या भेटी गाठी करत करत हा प्रवास चालला होता.
थकवा आला तर दोन मिनिट लांब श्वास घेऊन निसर्गाचे बहुरूपी देखणे रूप बघितले कि सर्व थकवा क्षणात नाहीसा होत होता. रस्त्यात गडावरून उतरणारे वाटसरू पुढे कसे कठीण आहे. काय काय अडचणी आहेत असे सांगून थोडासा धीर कमी करत होते खरे पण सोबतच वाटेतील वाटसरूंना थकवा कमी करण्या साठी प्रेमाने सरबत, चहा पाजणारे गावातील विक्रेते समोरील रंजक आणि भक्कम किल्याचे वर्णन करून आमचा उत्साह वाढवत होते. या परिसरातील लोकांचा स्वभाव फारच गोड आहे. त्यांचा व्यवसाय असला तरी आपल्या फायद्यासाठी कुणाला लुटणारे हे लोक नाहीत... त्यांच्या स्वभाव बद्दल बोलताना अनेकदा मला शाळेत इतिहासाच्या पुस्तकात शिवाजींनी रयतेला दिलेल्या शिकवणीची आठवण झाली. डोंगर वाटांमधून वाट काढत, चिखलात आपला तोल सांभाळत, निसर्गाला आपल्या डोळ्यात साठवून घेत सायंकाळी ६ च्या सुमारास गडाचा परकोट आम्हला दिसू लागला मधले मधले काही दगडी व कठीण रस्ते तेथे लागलेल्या लोखण्डी  सळ्यांनी धरून पार पाडण्यात आम्हाला यश आलं. जसा जसा किल्ला जवळ येत होता तसं तस मानतील उत्सुकता वाढत होती. तीन तासांच्या चढाई नंतर  महाराजांच्या गडांचा राजा असलेला भक्कम किल्ला आणि सह्याद्रीचा राकठ मुरुंबदेवाचा डोंगर आमची आतुरतेने वाट पाहत होता.
पद्मावती तलाव , राजगड 
गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत, त्यातील चोर दरवाजा किंवा गुप्त दरवाज्या मार्गे आम्ही गडात प्रवेश केला. गुप्तदरवाज्याकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे.  तलावाला वळसा घालून वर आल्यावर समोरच दगडी बांधकाम असलेले पद्मावती मंदिर आहे.
 
शिवाजीनी  किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे. आमचाही आज रात्रीचा मुक्काम याच मंदिरात असणार होता म्हणून खांद्यावरील अवजड ब्यागा खांद्यावरून उतरवून काही क्षण का होईना विश्रांती घेऊन आम्ही आमची स्वारी बालेकिल्ल्याकडे वळवली.


संध्याकाळचे ६ वाजून गेले होते पावसाळ्यातले दिवस होते पण फारसा अंधार पडला नव्हता.  किल्ल्याची सैर करत करत आम्ही आमची वाटचाल बालेकिल्ल्याकडे करू लागलो. मंदिरापासून पायऱ्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. त्याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारोचे कोठार आहे. सदर ही गडावरची सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.

बालेकिल्याचे महाद्वार 

राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. अर्ध्या तासाच्या चढाई नंतर आम्ही बाले किल्ल्याच्या बुलंद उभ्या असलेल्या दरवाज्यावर पोहोचलो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरूजही ठेवलेले आहेत. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. या तळ्यातील थंडगार पाण्यानी चेहरा धुवून आम्ही आमचा थकवा नाहीसा केला.

बालेकिल्यावरील चंद्रतळे 

  तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. परंतु  आम्ही गेलो त्या वेळी तेथे असलेले धुके आणि नंतर अल्केला पाऊस या मुले आम्ही काहीच बघू शकलो नाही. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात. वातावरण चांगले असले तर गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात. बाल्लेकिल्ला उतरून आम्ही परत पद्मावती मंदिराकडे जाऊ लागलो. खाली उतरलो तेव्हाही जरासा प्रकाश होताच म्हणून आम्ही  सुवेळा माची कडे जाण्याचा निर्णय घेतला एका वेळी एकच जण जाऊ शकेल, अश्या पायवाटेने आम्ही सुवेळा माची कडे जाऊ लागलो.
आमच्या डाव्या बाजूला खोल दरी होती प्रचंड धुक्यामुळे त्या दारातही काहीच दिसत नव्हते. हळू हळू अंधार पडू लागला, आम्ही आमच्या जवळचे टॉर्च लावून पुढे पुढे जात होतो . साधारण अर्ध्या तासाच्या नंतर अंधार व पाऊस या मुले काही  नासे  होऊ लागले आणि आम्ही परतण्याचा निर्णय घेतला..  गुडुप्प अंधारात निसर्गातील विविध आवाज अनुभवत आम्ही अखेर सुवेळा माची न जाताच पद्मावती मंदिर गाठले. दिवसभराचे चिखलाने माखलेले आणि ओले कपडे अंगावरून काढून कोरडे कपडे घातल्यावर शरीराला वेगळाच आनंद होत होता.  रात्री ९ वाजता ची पद्मावतीचे आरती आटपल्यावर मंदिरातल्या काकांनी आम्हाला चुलीवर केलेले  गरमागरम जेवण खाऊ घातले. दिवसभराचा थकवा आणि दुसऱ्या दिवशी चे टेंशन या मुले आम्ही फार जागरण न करता जेवण नंतर काही क्षणातच  आम्ही सगळे निद्रा अवस्था गाठली .



दुसऱ्या दिवशी सकाळी ६: ३० ला गरमागरम पोह्यचा आस्वाद घेऊन आम्ही तोरण्याची वाटचाल सुरु केली. संजीवनी माची मार्गे हत्तीच्या सोंडेचा आकार असलेल्या लहान मोठ्या पहाडांना पार करत आम्हाला तोरणा गडावर पोहचायचे होते.

संजीवनी माची च्या निमुळत्या रस्त्यावर एका मागोमाग जात असतांना प्रचंड धुक्यामुळे आम्हाला ५ फुटावरील व्यक्ती सुद्धा दिसेनासा होत होता. अखेर संजीवनी माची वरील अळू दरवाज्या मार्गे आम्ही गडाच्या बाहेर पडलो. पावसाच्या सरीन सोबत आम्ही काली उतरू लागलो. अनेक दगडी भागातून एक मेकाला सावरत साधारण ३ तासानंतर आम्ही एका डांबरी रस्त्यावर पोहोचलो . अनेक खडतर रस्ते, निसरड्या वाटा, आणि चिखल या सर्वातून डांबरी रस्त्यावर पाऊल ठेवताना आम्ही स्वर्गात आल्याचा विचार अनेकांच्या मनाला शिवून गेला.  पण हे स्वर्ग आमच्या वाट्याला नाहीच हे आम्हाला लगेचच कळले, कारण आम्हाला फक्त तो रास्ता ओलांडून नव्या पहाडाची चढाई सुरु करायची होती. फार वेळ न घालवता आम्ही पुन्हा चढाई ला सुरवात केली. दऱ्या, खोऱ्या, दगड , झाडे झुडपे, किडे सर्वांची दोस्ती करत आम्ही तोरणाच्या दिशेने चालू लागलो.

साधारण २४ तास नंतर सरळ व डांबरी रास्ता पाहून उत्साहात आलेले माझे सवंगडी  
क्षणां क्षणाला वेगळे आव्हान, त्यावर वेगळे उपाय आणि आव्हान पार पडल्यावर मिळणार वेगळाच आनंद अनुभवत आम्ही चालू लागलो. आता शरीराची क्षमता हळू हळू ढासळू लागली. पाणी आणि जवळचे खाद्यान्न याचा नियोजित वापर करत वाटचाल सुरूच होती … पाऊसही कमी झाला मध्ये तर अचानक ऊन डोकावून गेले. आणि एका खडतर दगडी रस्त्या नंतर आम्हला दिसली ती तोरणा गडाची बुधला माची. माची दिसत जवळ होती पण जाण्याचा मार्ग संपूर्ण खडतर होता. एका दगडी निसरड्या भागात एकमेकाला हात देत आम्ही बुधला माची ला पोहोचलो. बुधला माची नंतर  एका दगडी महा दरवाज्याने आमचे स्वागत केले. येथूनच आम्ही तोरणा गडावर प्रवेश केला.

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते.. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले. साधारण दुपारी  ३:३० च्या सुमारास  तोरणा गडावर असलेल्या तोरणजाई देवीच्या मंदिरात आम्ही येऊन स्थिरावलो. साधारण  ९ तासांच्या चालण्या नंतर अर्ध्या तासाची विश्रांती घेतांना हातात आयते मिळालेले गरम गरम पोहे खाऊन पोटाला खूप आधार मिळाला.   
                             
   आणि मग पुन्हा प्रवास सुरु झाला तो शेवटचा टप्पा म्हणजे तोरणा गडावरून खाली वेल्हे गावात उतरण्याचा. गावात उतरतांना दगडी पायवाटीच्या बाजूनी वाहणारे झरे आमच्या थकलेल्या शरीराला आधार देत होते. मधेच कधीतरी जोरदार येणार पाऊस आमची मानसिक चिडचिड वाढवत होते. पण अखेर सायंकाळी ६ च्या सुमारास आम्ही वेल्हे गावाच्या कुसावर आमची वाट पाहणारी बस गाठली. बस मध्ये बसल्यावर पुण्याला पोचण्याचा २ तसंच प्रवास सर्व शांत बसलेले होते.. या शांतते मागच कारण फक्त थकवा नव्हतं तर प्रत्येक जण मनातल्या मनात मागच्या २८ - ३० तासात निसर्गात घालवलेला क्षण आणि क्षण पुन्हा पुन्हा आठवून मनात घट्ट बसून घेत शिवकाळातल्या या दोन भक्कम किल्यांना आपला निरोप देत होते .